राजकारण

अन राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत पोहोचले संसदेत

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 July :- दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आवाज थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. विरोधी पक्ष शेतकरी कायद्यांच्या मुद्द्यांवरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारवर सातत्यानं टीकेची झोड उठवत आहेत. अशातच आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकरी कायद्यांविरोधातील आंदोलनात सहभागी झाले. राहुल गांधी आज स्वतः ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले.

राहुल गांधी जो ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले, त्यावर एक बॅनर लावण्यात आला होता. ज्यावर ‘शेतकरी विरोधी तीन काळा कृषी कायदे मागे घ्या, मागे घ्या’ असं लिहिलं होतं. संसदेत पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले की, “आम्ही शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत आलो आहोत. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यात येत आहे. सरकारला कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील. हे कायदे 2-3 मोठ्या उद्योजकांसाठी तयार करण्यात आले आहेत. हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाहीत. हे काळे कायदे आहेत.”