महाराष्ट्र

आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण निर्देश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

“करोना रुग्ण व मृत्यूदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर अधिक भर देऊन बाधित रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत.” असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापूर येथे आरोग्य यंत्रणेस दिले. तसेच, “ताप, सर्दी, खोकला यासह अन्य काही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ तपासणी करुन घ्यावी.” असे आवहन देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले.कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना प्रादुर्भाव नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलत होते.तर, कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यात उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करुन देईल असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या बैठकीस ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, अखिल महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील तसेच खासदार, आमदार, पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, “प्रथमदर्शनी कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड, गगनबावडा, शिरोळ तालुक्यामध्ये करोनाचा रुग्णदर अधिक असल्याचे दिसत आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी या तालुक्यात मृत्यूदर अधिक आहे. जिल्ह्यातील करोना रुग्ण व मृत्यूदर कमी होण्यासाठी तपासण्यांवर अधिक भर देऊन बाधित रुग्णांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून द्यावेत. लसीकरणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, ही चांगली बाब आहे. महाआयुष ॲप, संजिवनी अभियान जिल्ह्यात चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सहव्याधीग्रस्त रुग्णांवर अधिक लक्ष द्या. कोविड पश्चात आजार उद्भवू नयेत, याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे. तसेच, संपर्कातील रुग्णांचा शोध घ्या. मृत्यूदराचे ऑडीट करुन घेऊन त्रूटी दूर करा.

आरोग्य विषयक प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. कोल्हापूर मधील सीपीआर व इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे”, असे निर्देशही यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असणाऱ्या उपाययोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली, तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कोविडच्या अनुषंगाने मतदारसंघात आरोग्य विषयक सोयी सुविधांची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासनाकडून आवश्यक असणाऱ्या बाबींचा ऊहापोह करुन आभार व्यक्त केले.