राजकारण

केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले

शरद पवारांचे सदानंद गौडांना पत्रं

18 May :- केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

शरद पवार यांनी हे पत्रं ट्विटही केलं आहे. या पत्रातून पवारांनी सदानंद गौडा यांचं देशातील कोरोनाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांवरील संकटाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जनतेवर प्रचंड परिणाम झाला आहे. अनेकांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. शेतकऱ्यांवरही या आजाराचा मोठा परिणाम झाला असून त्यांच्या अडचणी सोडवण्याची गरज आहे. मात्र, असं असताना शेतकऱ्यांना मदत करण्याचं सोडून सरकारने खतांच्या दरांमध्ये वाढ केल्याचं मी ऐकलं आहे.

आधीच लॉकडाऊनमुळे बाजार पूर्णपणे कोलमडला आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आला आहे. अशा वेळी केंद्राचा हा निर्णय थेट शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे. एकीकडे इंधनाचे दर वाढत आहे. त्यात कोरोनाचं संकट आहे, असं असताना सरकारने खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे, असं पवारांनी पत्रात म्हटलं आहे.