News

मंत्रिमंडळाची आज बैठक, लॉकडाऊन वाढवण्यावर होणार शिक्कामोर्तब?

मुंबई, 12 मे: महाराष्ट्रात कोरोनाने (Maharashtra corona cases) थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ (Break the chain) म्हणत लॉकडाऊनचा (Lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

आज मंत्रालयात दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली असून येत्या 15 मेला आता सुरू असलेल्या कडक निर्बंध नियमावली कालावधी संपत आहे. महाराष्ट्राच्या शिवाय देशात कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार यासह इतर राज्यात corona रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र देखील साधारण मागील कालावधीमधील आकडेवारी भलेही कमी होत असली तरी आकडा 50 हजाराच्या आसपास आहे.

विशेष म्हणजे, मुंबई, पुणे,नागपूर,अमरावती, औरंगाबाद आणि सोलापूर या मोठ्या शहरात मागील महिन्याच्या तुलनेने आता रुग्ण संख्या कमी आढळत असली तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये रुग्ण संख्या प्रचंड वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेसमोर आणि राज्य सरकार समोर सगळ्यात मोठे आता संकट ग्रामीण महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी करणे आहे. तूर्तास तरी आता सुरू असलेल्या काळत नियमावली येत्या 15 मेपर्यंत संपणार आहेत.

महाराष्ट्रात एक महिन्याच्या कालावधीत शहरी भागातील रुग्ण संख्या कमी होण्यास फायदा जरी झाला असला तरी ग्रामीण भागांमध्ये रुग्ण संख्या वाट पाहता महाराष्ट्रात परत एकदा कडक निर्बंध 30 मे पर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

तसंच लसीकरणाबाबत वय वर्ष 18 ते 44 वयोगटाला आता लस थांबून उपलब्ध लस वय वर्ष 25 पेक्षा अधिक असणाऱ्यांना दुसरा डोस देण्यासाठी वापरावी याबाबत सुद्धा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, मंगळवारी याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तशा स्वरूपाचे संकेत देखील दिले आहेत. पण आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतील सर्व मंत्र्यांबरोबर चर्चा करूनच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं समजतं आहे.

राज्यातील पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर म्हणून जाहीर करावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडी तिलाच इतर नेत्यांनी दबाव वाढवला आहे. तरीदेखील अद्यापपर्यंत उद्धव ठाकरे यांनी याबाबत निर्णय घेतला नाही. बिहार, मध्यप्रदेश, पश्‍चिम बंगाल या राज्यांनी यापूर्वी याबाबतचा निर्णय घेतला असला तरी महाराष्ट्रासारख्या राज्यात निर्णय का होत नाही, यावरून देखील अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं, आज देखील आजच्या कॅबिनेट बैठकीत याबाबत चर्चा होऊन याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.