बीड

15 मे नंतर ओसरणार राज्यातील कोरोनाची लाट

झुंजारनेता वर प्रेस करा आणि ज्वाईन करा वॉटसएप ग्रूप

17 April :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुसाट सुटली असून, दररोज राज्यात सरासरी 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र, 15 दिवसांचा कडक लॉकडाउन केल्याने विषाणूची साखळी निश्‍चितपणे खंडित होणार आहे. 15 मे नंतर राज्यातील कोरोनाची लाट निश्‍चितपणे कमी होईल, असा विश्‍वास वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्‍त केला आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या लाटेतील कोरोना विषाणूच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील विषाणू कमी धोकादायक आहे. मात्र, लक्षणे असतानाही विलंबाने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मृत्यू वाढत आहेत. राज्याचा मृत्यूदर पूर्वीच्या कोरोना लाटेच्या तुलनेत सुमारे तीन टक्‍क्‍यांनी कमी आहे.

राज्यातील 54 टक्‍के लोक विनामास्क फिरत होते, अनेक ठिकाणी नियमांचे पालन होत नव्हते. परंतु आता लॉकडाउनमुळे गर्दीच्या माध्यमातून वाढणाऱ्या या विषाणूची साळखी खंडित होईल. आता घरातील जेवढे अधिकाधिक रुग्ण आढळतील, तेवढाच पुढील धोका कमी होईल. त्यामुळे ही लाट 15 मेनंतर ओसरायला सुरू होईल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

प्रतिबंधात्मक लसीकरणाचाही वेग आता वाढू लागला आहे. लॉकडाउनमुळे घरी थांबलेले संशयित थेट दवाखान्यात जात असल्याने त्यांच्यावर तत्काळ उपचार केले जात आहेत. अनलॉकनंतर नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन तंतोतंत करावे, लस टोचून घ्यावी, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असेही डॉ. लहाने या वेळी म्हणाले.