महाराष्ट्र

अर्थसंकल्प म्हणजे, बोतल वही है, सिर्फ शराब बदल गयी

राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

2 Feb :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी निराशाजनक आहे. या अर्थसंकल्पात काहीही विशेष तरतूद केलेली नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे, बोतल वही है, सिर्फ शराब बदल गयी है, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी तर, नागपूर मेट्रोसाठी 5976 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कारण येथील निवडणुका लवकरच अपेक्षीत आहेत. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, नाशिक-पुणे, कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी तरतूद केल्याचे दिसून येत नाही. रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प एकत्रित करुन, केंद्रानं आपलं अपयश, अकार्यक्षमता लपवण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे.

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांपासून ते गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. महाराष्ट्रासाठी विशेष अशी तरतूद नसल्याने केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने अन्यायच केला आहे.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकाचे आर्थिक गणित कोलमडले असतांनाही यावेळी त्याला करात कुठल्याही प्रकारची सुट देण्यात आलेली नाही. महिला, शेतकरी, उद्योग, नोकरदार वर्ग, युवा या सार्‍यांचाच अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.