राजकारण

महाराष्ट्रद्रोही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे आता कुठे गेले?

जगताप यांनी केला सवाल

30 Jan :- कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई केंद्रशासित करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचे महाराष्ट्रात तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपला घेरलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आता भाजपवर बोचरी टीका केली आहे. ‘महाराष्ट्रद्रोही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चमचे आता कुठे गेले?,’ असा सवाल जगताप यांनी केला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

मुंबईत मोठ्या संख्येनं कानडी भाषिक आहेत. हे शहर कर्नाटकशी जोडावे अशी कर्नाटकातील कानडी भाषिकांची भावना आहे. ही मागणी पूर्ण होत नाही तोवर मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी सावदी यांनी केली होती. सावदी यांच्या या वक्तव्याचा भाई जगताप यांनी समाचार घेतला. ‘सावदी हे कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. या पदावरच्या वक्तीनं असं निरर्थक विधान करणं निषेधार्ह आहे. एखादं वक्तव्य करताना त्यांनी किमान अक्कल वापरायला हवी. ज्या महाजन समितीच्या अहवालाचा संदर्भ देऊन सावदी मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करतात, तो अहवाल बेळगावसह सीमाभागाशी संबंधित आहे. मुंबईशी त्याचा दुरान्वये देखील संबंध नाही.

सर्वोच्च न्यायालयात सध्या असलेले प्रकरण पूर्णपणे वेगळे आहे,’ असं जगताप म्हणाले. सावदी यांना फटकारतानाच जगताप यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवरही तोफ डागली. ‘भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व त्यांचे चमचे एरवी मोठमोठ्या बाता मारतात. त्यांना सावदी यांचं हे वक्तव्य खटकलं कसं नाही? त्यांच्या विरोधात ते चकार शब्दही काढत नाहीत. कंगना राणावत सारख्या दीडदमडीच्या नटीनं मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली, तेव्हा भाजपचे हेच चमचे तिची तुलना झाशीच्या राणीशी करत होते. आताही सावदी यांच्या वक्तव्यावर हे लोक मूग गिळून गप्प आहेत. हेच त्यांचं मुंबईबद्दलचं प्रेम आहे का?,’ असा सवालही जगताप यांनी केला आहे.