NewsPopular News

शरद पवार राज्यपालांना भेटले; चर्चा तर होणारच!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमागचं कारण काय याची चर्चा लगेचच राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

हाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ‘राजभवन’ कधी नव्हे इतके चर्चेत आले आहे. विधान परिषदेच्या नुकत्याच बिनविरोध झालेल्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकांवर अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. कोश्यारी हे भाजपच्या कलानं वागत असून सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही झाला होता. भाजपच्या नेत्यांच्या राज्यपालांसोबत होणाऱ्या सततच्या गाठीभेटींमुळं यात भर पडली होती.विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानं ही चर्चा थांबल्याचं वाटत असतानाच आत सत्ताधारी नेते राज्यपालांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहेत. अलीकडंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांवर कडवट टीका करणाऱ्या राऊत यांनी कोश्यारींची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ती चर्चा संपते न संपते तोच आज पवारांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं.

राष्ट्रवादीनं मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे. ‘राज्यपालांनी पवार साहेबांना चहासाठी बोलावलं होतं. त्यांच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळं त्यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,’ असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर सांगितलं.

दरम्यान, भाजपचे राज्यसभेतील खासदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील राज्यपालांची भेट घेणार असल्याचं कळतं.