बीड

दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा थेट आरोप

मुंबई, 27 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) दिवशी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचाराच्या मागे भाजपचाच हात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. तसंच, शरद पवारांचावर टिका करणाऱ्या आशिष शेलारांना (Ashish Shelar) डोकं आहे का? असा टोलाही मलिक यांनी लगावला.

नवी दिल्लीतील हिंसाचारावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर हल्ला करणे ही कोणती देशभक्ती आहे, हिंसा सुरू असताना तुमचे तोंड का शिवले होते? अशी टीका शेलार यांनी केली होती.

शेलार यांच्या टीकेला नवाब मलिक यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.  ‘शरद पवार यांनी दिल्लीतील घटना घडल्यानंतर टीका केली होती, त्यांच्याकडून अशी अपेक्षित नाही असं स्पष्टपणे म्हटलं होतं. आता शरद पवारांवर टीका करणाऱ्या आशिष शेलार यांना डोकं आहे का? असा सवाल उपस्थित करत मलिक यांनी जोरदार टोला लगावला.

तसंच, ज्याच्यामुळे दिल्लीत अशी परिस्थिती उद्भवली आहे.  त्या दीप सिंग सिद्धू याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि कालच्या घटनेमध्ये त्याचा महत्त्वाचा रोल आहे का? याचा खुलासा भाजप का करत नाही, असा सवाल मलिक यांनी उपस्थितीत केला.  ‘दिल्लीत घडलेली घटनेमागे भाजपचाच हात असल्याचा आरोप सुद्धा नवाब मलिक यांनी केला आहे.

काय म्हणाले होते शेलार?

शरद पवार हे नेहमी काही ना काही फेसबुकवर पोस्ट करत असतात. पण कालच्या दिल्लीतील घटनेवर त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली नाही. तुमचे फेसबुक पोस्ट जवान, पोलिसांच्या बाजूने का नाही. पोलिसांवर हल्ला करणारे हे कोणत्या देशभक्तीची व्याख्या आहे.  या आंदोलनावर शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आता का शिवली आहे? अशी घणाघाती टीका शेलार यांनी केली होती.