भारत

देशात या तारखेपासून लसीकरणाला होणार सुरुवात

पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना देणार लस

9 Jan :- देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू होणार आहे. सरकारने शनिवारी याची घोषणा केली. सुरुवातीला ही लस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन कामगारांना दिली जाईल, ज्यांची संख्या 3 कोटी आहे. दुसर्‍या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त व तिसर्‍या टप्प्यात गंभीर आजाराने ग्रस्त 50 वर्षाखालील लोकांना लस दिली जाईल. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात सुमारे 27 कोटी लोकांना लस दिली जाईल. लोहरी, मकरसंक्रांत, पोंगल आणि माघ बिहू यासारखे सण लक्षात घेऊन 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी राज्यांच्या तयारीचा आढावाही घेतला. या बैठकीला कॅबिनेट सचिव, प्रधान सचिव, आरोग्य सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ज्या लोकांना लस दिली जाणार आहे, त्यांना सत्राचे वाटप, पडताळणी आणि लसीकरणानंतर प्रमाणपत्र मिळण्यासाठी डिजिटल व्यासपीठाची मदत मिळेल, असेही सरकारने म्हटले आहे.

देशात आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. दोन्ही लसी देशाच्या विविध भागात पोहोचवण्यासाठी सरकारने परिवहन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.