News

सातत्याने महागणाऱ्या खाद्य तेलामुळे सामान्यांचं बजेट बिघडलं, कधी मिळणार दिलासा?

नासिर हुसैन, नवी दिल्ली, 09 जानेवारी: मोहरीचे तेल (Mustard Oil) असो किंवा रिफाइंड आइल, या तेलांच्या किंमती गेल्या काही काळापासून सातत्याने उसळत आहेत. यामध्ये देखील मोहरी तेल आणि सूर्यफूल तेल सर्वाधिक प्रमाणात महाग होत आहेत. अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे असे म्हणणे आहे की, अलीकडेच देशात आणि परदेशात अशी अनेक मोठी कारणे उद्भवली आहेत ज्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती सतत वाढत आहेत.  केंद्र सरकारने पाम तेलातील आयात शुल्कात दहा टक्क्यांनी कपात केली होती. महासंघाच्या मागणीनुसार केंद्राने हा निर्णय घेतला होता. असे असले तरीही या नवीन कारणांमुळे देण्यात आलेल्या सवलतीचा देखील किंमतींवर परिणाम झाला नाही.

परदेशात वाढल्या तेलाच्या किंमती

अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘भारतात 65 टक्केपेक्षा जास्त प्रमाणात  खाद्यतेलाची आयात करावी लागत आहे. सध्या परदेशामध्येच तेलाच्या किंमती  वाढल्या आहेत. त्याठिकाणी खराब हवामानामुळे पीकं आधीच खराब झाली आहेत. लॅटिन अमेरिकेत खराब हवामानाचा सोयाबीन उत्पादनावर लक्षणीय परिणाम झाला आहे. इंडोनेशियामध्ये पाम तेलाचे उत्पादन वाढलेले नाही.  मलेशियामध्ये ऑटो इंधनात 30 टक्केपर्यंत पाम तेल मिसळण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.  ज्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अर्जेंटिनातील संपाचा तेलांच्या पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.’

मे-जूनपर्यंत महागाई कमी होण्याची शक्यता

ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशनचे सरचिटणीस तरुण जैन यांच्या मते, ‘तेलांवरील जीएसटी काढून टाकला पाहिजे अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. जेणेकरून खाद्य तेलांवरील महागाई कमी होईल. त्याचबरोबर, सरकारकडे अशी देखील मागणी करत आहोत की टेरिफ दर काही महिन्यांसाठी कमी केला जावा. ज्यामुळे आयात शुल्क प्रभावी होईल. एक मोठी मागणी देखील आहे की, सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून खाद्य तेलाच्या विक्रीला अनुदान देण्याची योजना बनवण्यात यावी. कारण एप्रिल-मे पर्यंत किंमती स्थीर होण्याची अपेक्षा आहे.’