News

आठवी चर्चाही निष्फळ, ‘जिंकू किंवा मरू’ शेतकऱ्यांचा निर्धार

नवी दिल्ली : कृषी कायद्यांवर केंद्रातील काही मंत्री आणि शेतकऱ्यांची आज आठव्या टप्प्यात झालेली चर्चाही निष्फळ ठरलीय. यानंतर, पुन्हा एकदा १५ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीतही शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं केंद्राकडून सांगितलं जातंय. तर शेतकऱ्यांनी मात्र केंद्राच्या टोलवाटोलवीवर कडक भूमिका घेतलीय. ‘किसान एकता मोर्चा’च्या फेसबुक पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आलाय.

बैठकीत एका शेतकरी नेत्यानं एक नोटमध्ये ‘जिंकू किंवा मरू’ असा निर्धार व्यक्त केलाय. चर्चेत सहभागी झालेल्या शेतकरी नेते बलवंत सिंह बरामके यांनी आपल्या टेवलवर डायरीमध्ये पंजाबी भाषेत ‘जिंकू किंवा मरू’ असं लिहिलेलं आढळलं. त्यामुळे, केंद्राच्या टोलवाटोलवीवर शेतकऱ्यांनी आपण मागे हटणार नसल्याचा निर्धार केल्याचं दिसतंय.

गेल्या ४४ दिवसांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन संपवण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज आठव्या टप्प्यात चर्चा झाली. दुपारी २.३० वाजता सुरू झालेल्या या बैठकीत ४० शेतकरी नेते सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्यावतीने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशिवाय रेल्वे आणि खाद्य वितरण मंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश या बैठकीत हजर होते.

शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनाला राजधानीत ट्रॅक्टर मार्चची घोषणा करण्यात आलीय. तर कृषीमंत्र्यांनी मात्र संपूर्ण देशाची परिस्थिती लक्षात घेऊन मगच कोणताही निर्णय घेण्यात येईल, असं म्हटलंय.